_ भंते महाविरो थेरो
लातूर,दि.०४(मिलिंद कांबळे)
मानवाला- मानवाच्या दुःखातून मुक्त करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे प्रत्येक मानवाने धम्माचे योग्य आचरण केले तर दुःखातून मुक्त होता येईल असे प्रतिपादन भंते महाविरो थेरो यांनी केले.
वैशाली बुद्ध विहार बौद्धनगर लातूर येथे वर्षावास पुनित पर्वाच्या निमित्ताने आयोजित बौद्ध उपासक – उपसिका संस्कार शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलतांना भंते पुढे म्हणाले की, दुःख हा भवरोग आहे आणि या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे प्रत्येकानी धम्माचे योग्य आचरण करणे गरजेचे आहे.
याच गोष्टीवर भगवान बुद्धांनी ४५ वर्षे भर दिला होता. मानवाचे दुःख हे त्याच्या अविद्येमुळे निर्माण होते.म्हणून मानवाने आपली अविद्या नष्ट करून आपल्या अंतःकरणात प्रज्ञा चक्षु निर्माण करणे हे समग्र मानव जातीचे नैतिक अधिष्ठान असावे.
त्याचप्रमाणे परिवारिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, एकसंघ राहावी यासाठी बुद्धांचा विशेष आग्रह होता.
जो समाज पुन्हा – पुन्हा एकत्र येतो, एकत्र येऊन विचार विनिमय करतो, विचार विनिमय करून एक मुखाने निर्णय घेतो त्या समाजाला देशातील अथवा जगातील कोणतीही व्यवस्था हरवू शकणार नाही.
हे बुद्धांनी विशेष रूपाने सांगितलेले आहे.
जो माता-पित्यांची सेवा करतो तो आपल्या समाज बांधवांची सेवा निश्चित करतो, तोच व्यक्ती धम्मासाठी विशेष परित्याग करू शकतो.अन्यथा मातापित्यांचा गौरव न करणारे, परिवारासाठी, समाजासाठी, आणि पर्यायाने धम्मासाठी काहीच करू शकणार नाहीत. पर्यायाने धम्माचा विकास होणार नाही असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.
यावेळी आयुष्यमती लता चिकटे, लता गायकवाड, सविता चिकाटे,लता कांबळे,दिक्षा गायकवाड,मिना सुरवसे, ललीता मगर, आशा बानाटे,आयु.सुर्यभान लातूरकर,गौतम. चिकाटे, राजु कांबळे, उत्तम गायकवाड,भरत कांबळे,रामु कोरडे, महादेव गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी भिमाई संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले. भंतेजींच्या आशिर्वादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.