बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल सर्व वर्तमानपत्रात टीका केलेली असायची. त्याचा परामर्श घेताना बाबासाहेब म्हणतात:
“टीका करण्याचा हक्क कोणाचा? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे, त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणाऱ्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाऱ्याला-मारणाऱ्याला टीका करण्याचा अधिकार नाही. ……म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी ह्या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार? ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलं. आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळविल्या आहेत. आम्ही आमच्या पायावर उभे राहू.”
~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.


