लढा नामांतराचा

नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही ‘सरकारी मागणी’ होती. १४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार दिवस पण या नामविस्तार दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला 16 वर्ष सतत रक्त, आश्रू सांडून अविरत संघर्ष करावा लागला.१४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’जवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमा होतो. श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. नामांतर लढ्यात शाहिद झालेल्या हुतात्म्या ना आदरांजली वाहतो, व नवीन लढ्याना सज्ज होतो.
नामांतराची लढाई हि प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती.हा लढा कुणाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा नव्हता. कुणाचा दुस्वास करणारा तर मुळीच नव्हता. परंतू एका गटाने प्रादेशिक अस्मितेची लढाई लढली, तर दुसऱ्याने नामांतर जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला होता. हे केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आलं होतं.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांना आदेश दिला “शहराकडे चला” कारण प्रगती साठी, शिक्षण आणि रोजगारासाठी शहरे सोयीची ठरत होती. लोक शहरात स्थिरावले. आधीपासूनच शेती नसलेले आणि हातावर पोट असलेली दलित कुटुंबं मजुरीसाठी शहरांकडे धाव घेत होती. शहरांकडे स्थलांतर करणारे कुणी एकाजातीचे नव्हते, तर अठरापगड जातींचे होते. या स्थलांतराचा ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम झाला. शेतीची घडी विस्कटली, शेत-कामासाठी मजूर मिळेनासे झाले. त्यात 1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या बरोबर लाखो दलितांनीही धर्मांतर केलं. गावकीची कामं सोडलीच होती आता हिंदू धर्मही सोडला.त्यांनी हाजारो वर्षाच्या धर्माने लादलेल्या गुलामीचे साखळदंड तोडून आत्ता स्वतंत्र देशाचे स्वतंत्र समान मूल्य असणारे नागरिक झाले होते.
कालपर्यंत खाली मान घालून चालणारा, ‘जी मालक’ “जोहार माय बाप “म्हणत कायम कमरेत वाकलेला दलित माणूस ताठ मानेने वावरू लागला. दलितांचे असं ‘पायरी सोडून’ असं माणसा सारखे वागणं अनेक सवर्णांच्या डोळ्यांत खुपू लागलं होतं. दलितांचा स्वाभिमान अनेकांना मुजोरपणा वाटत होता.शिवाय कामधंद्याला शहरात गेलेली ही मंडळी सणासुदीला नवे कोरे अंगभर कपडे घालून टेचीत गावात यायची. गाठीला पैसा अडका असायचा बायकांच्या अंगावर नवं लुगडं, एखाद दुसरा दागिणाही दिसायला लागला होता. त्यांच्याकडं जे होतं ते त्यांच्या कष्टाचेच, घाम गाळून कमावलेले होते. तरीही इतरांना ते बघवत नव्हतं. या ना त्या कारणानं काही सवर्णांच्या मनात दलितांविषयीची असूया वाढत गेली. हा सगळा राग नामांतर आंदोलनात उफाळून आला.
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्वाचा लाभ आहे. दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वाच्च शिक्षण , उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. माऱ्याच्या जागा काबिज करू शकतात. त्यामुळे उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्चशिक्षण हे बुद्धीजीवी वर्गाची मक्तेदारी असली तरी, या शिक्षण क्षेत्रात गरीब व मागासवर्गीय समाजाला समान संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून सत्ता, संपत्ती, शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या अनंत यातना भोगत असणाऱ्या समाजाला शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५० ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरु करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि डॉ. बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित आणि दूरदृष्टी मुळेच १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली.
शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभिर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यावाचक नावे होती. फक्त दोनच व्यक्तींची नावे सुचविली होती – छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. (Ref नेट )
१) २६ जून १९७४- नामांतराची पहिली मागणी केली गेली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र वाहूळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठवाड्यातील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली.
२)१६ जुलै १९७४- मुख्यमंत्री सचिवालयाने मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाला पत्र लिहून मागणीचे नोंद घेतली.
३) ७ जुलै १९७७- मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी जाहिर मागणी प्रथम दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी केली.
४)१७ जुलै १९७७ – औरंगाबादच्या सरस्वती भुवनच्या प्रांगणात सर्वपक्षीय विद्यार्थी -युवक संघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थी कृति समितीची स्थापणा केली. या समितीत युवक क्रांती दल, युवक काँग्रेस, अ.भा.वि.प.जनता युवक आघाडी, समाजवादी क्रांती दल, एस.एफ.आय., दलित युवक आघाडी, युवा रिपब्लिकन , दलित पँथर, पुरोगामी युवक संघटनेचा समावेश होता. या बैठकीत इतर मागण्यासह मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली.
५) १७ जुलै १९७७- नामांतरासाठी पहिले जाहिर आंदोलन विद्यार्थी कृति समितीने पुकारले ते गुलमंडीवर एका दिवसाची धरणे देऊन. त्यात गणेश कोठेकर, अनिल महाजन, प्रवीण वाघ, विजय गव्हाणे, ज्ञानोबा मुंडे, पंडित मुंडे आदींचा प्रमुख सहभाग होता.
५) १८ जुलै १९७७- विद्यार्थी कृति समितीने कॉलेज बंदचे आवाहन केले त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. त्यासह समितीने एक मोठा मोर्चा विद्यापीठावर काढला. त्याच दिवशी विद्यापीठ कार्यकारणीची बैठक होती.
-विद्यापीठ कार्यकारणीने विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा एकमुखी ठरावही याच बैठकीत पारित केला. तेव्हा कुलगुरू भोसले , वसंतराव काळे, आ. किसनराव देशमुख,प्राचार्य राजाराम राठोड यांचा कार्यकारणीत समावेश होता.
६) १८ जुलै १९७७- प्राचार्य संदानशिव यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्गीय प्राध्यापकांचा मोर्चाही विद्यापीठावर धडकला.
७)१८ जुलै १९७७- विद्यापीठास मौलाना आझाद यांचे नाव द्या, अशी मागणी करणारे निवेदन अहमद रझा रझवी, सिराज देशमुख, एस.एन. काद्री, मिर्झा शाहिन बेग यांनी विद्यापीठा दिले होते.
८) १९ जुलै १९७७- विद्यार्थी कृति समितीतर्फे परभणीत मोर्चा काढण्यात आला. रामराव जाधव व माधव हातागळे यांनी नेतृत्व केले. बीड, जालना येथेही मोर्चे निघाले.
९) याच दरम्यान काही वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कार्यकारणीस निवेदने देऊन विद्यापीठास स्वामी रामानंद तीर्थांचे नाव देण्याची मागणी केली.
१०) २१ जुलै १९७७- नामांतराल्ल विरोध करणारा पहिला मोर्चा निघाला. इंजिनिअरिंग, सरस्वती भुवन, देवगिरी, विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामुळे नामांतर चळवळीला जातीय रंग मिळाला.
– याच दिवशी सायंकाळी विद्यार्थी कृति समितीने महाराष्ट्र शासनाची प्रेतयात्रा काढली.
११) २२ जुलै १९७७- दलित पँथरचे नेते प्रीतमकुमार शेगावकर आणि गंगाघर गाडे यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
१२) २३ , व २४ जुलै १९७७- जनता मुस्लिम फोरमची औरंगाबादेत बैठक होऊन नामांतरास जाहिर पाठिंबा. या बैठकीला एसेम जोशी यांनी मार्गदर्शन केले.
१३) २४ जुलै १९७७- उस्मानाबादेत नामांतर विरोधी विद्यार्थ्यांनी आंदोलन कले.
१४) २४ जुलै १९७७- दलित पँथरची औरंगाबादेत बैठक व नामांतर लढा तिव्र करण्याचा निर्णय.
१५)२६ जुलै १९७७ – दलित पँथरचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा.
१६) ३० जुलै १९७७- मिलिंद महाविद्यालय परिसरातून शहरात मोर्चा.
१७)२ आॅगस्ट १९७७- दलित पँथरने मराठवाडाभर आंदोलनाचा निर्णय घेतला व नामांतर आंदोलनाची तिव्र लढाई सुरू झाली. आॅगस्ट मध्येच नामांतर विरोधी महाविद्यालयीन कृति समितीनेही आंदोलने सुरू केली व मराठवाडा जातीय द्वेषाने भडकू लागला.
१८) २० ऑगस्ट १९७७- मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शहरात , प्रीतमकुमार शेगावकर यांनी सुभेदारीवर मोर्चा काढला. शेगावकर, बाबुराव कदम, दौलत खरात यांना मुख्यमंत्र्यांचे २६ आॅगस्ट रोजी मुंबईत चर्चेचे निमंत्रण.
१९) ८ सप्टेंबर १९७७- मुंबईत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मराठवाड्याीतल सामाजिक कार्यकर्ते व दलित नेत्यांची बैठकीत. नामांतरावर एकमत. या बैठकीला गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा, गोविंदभाई श्रॉफ आदींची प्रमुख उपस्थिती .
२०) ११ सप्टेंबर १९७७: सरस्वती भुवन महाविद्यालयात नामांतर विरोधी महाविद्यालय विद्यार्थी कृति समितीची बैठक व १२ सप्टेंबर पासून बहिष्काराचे आंदोलनाचा इशारा.
२१) १७ सप्टेंबर १९७७- मागासवर्गीय सुधार महासंघानेही बैठक घेऊन नामांतरास पाठिंबा दिला.
२२) १९ सप्टेंबर १९७७- नामांतर विरोधकांचा मराठवाडा बंद, आंदोलने.
२३) २३ सप्टेंबर १९७७- मराठवाड्यातील जातीय तणाव निवळावा म्हणून काम करण्यासाठी प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक- विद्यार्थी कृति समितीची स्थापना.
२४) २३ सप्टेंबर १९७७- दलित युवक आघाडीने मूक मोर्चा काढला.
–याच पद्धतीनेपुढे मोर्चा व प्रतिमोर्चा असे मराठवाडाभर जिल्हे, तालुके, एवढेच नव्हे तर गावपातळीवरही आंदोलन व प्रतिआंदोलनाचे सत्र सुरू झाले आणि मराठवाड्यात दलित -सवर्ण संघर्षाच्या ठिणग्या झडू लागल्या.
२५) २७ जुलै १९७८- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामांतराचा ठराव मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित झाला.
२६) ऑगस्ट १९७८- नामांतराचा ठराव पारित झाल्यानंतर मराठवाड्यात तब्बल ११ दिवस जातीय दंगल उसळली. त्यात दलितांना जीवंत जाळण्यासह घरेदारे पेटवून देण्यात आली. दलित महिलांवर अत्याचार झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी करण्यात आली. याचे पडसाद मराठवाड्याबाहेर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कमी जास्त स्वरूपात उमटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ ला संमत करण्यात आला.महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला.
ज्या मराठवाडयात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाडयाला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्तीथ झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला,
परंतु जातीवादी, सरंजामी, राजकीय नेत्यांनी पद्धतशीर पणे स्थानिक नेते व प्रतिष्टीत लोकांना हाताशी धरून लोकांच्या मनात विष पेरले, वृत्तपत्रातून लोकांच्या भावना भडकावल्या जाऊ लागल्या. “घरात नाही पिठ अन मागताय विद्यापीठ” असे हेटाळणी करणारे वक्तव्य बाळ ठाकरे यांनी करून, जातीवाद्यांना प्रोसाहन, चिथावणी दिली. जातीयवादी लोकांचे पीत्त खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. रात्रीतून नामांतर विरोधात दंगली पदतशीर पणे सुरू झाल्या (की पेटवल्या) गेल्या . अनेक वर्ष मराठवाडा जातिय द्देशाने धुमसत होता. जातीयवाद्यांच्या या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराला त्वेषाने विरोध केला गेला, तेवढ्याच तीव्रतेने दलितांच्या या आंदोलनाला लढ्याचे स्वरूप आले. दलितांना एकटे पाडले जात होतं. हर तऱ्हेने दलितांची कोंडी केली जात होती, छळ केला जात होता. अत्याचारात भयानक क्रूरता होती. विशेष म्हणजे हल्लेखोर सरकारी पाठिंब्या मुळे मोकाट सुटले होते.
1972 ला दलित पॅंथरची स्थापना झाली होती . दलित पँथरच्या चळवळीने राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, भाई संगारे, रामदास आठवले, अरुण कांबळे गंगाधर गाडे, सुरेश सावंत असे अनेक धडाडीचे आणि झुंझार नेते होते, दलित पॅन्थर भारतातच नव्हे तर इंग्लंड मध्ये सुद्धा स्थापन झाली होती . गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, गावातील पाणवठ्यांवर पाणी भरता यावे, यासाठी दलित पॅँथरचं आंदोलन सुरू होतं. त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणी जोर धरू लागली.नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या समतेसाठी लढाई झाली होती.
ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी प्रस्थापितांच्या विरुद्ध लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक – युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची अक्षरशः राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगीनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. दलित आया- भगीनींच्या कित्येक गावातून भरचौकातून नग्न धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलीसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध,पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. अन्यायाला पारावार राहिला नव्हता. एकीकडे दमणकारी सरकार, पाशवी पोलिस आणि दुसरीकडे सरकार आणि पोलिसयंत्रणेचे पाठबळ असणारे प्रतिगामी जातीयवादी नराधम अश्या दुहेरी त्रासात अडकलेले दीनदुबळे, गरीब, असह्य लोक. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच शरणानगती किंवा माघार, घेतली नाही. फक्त आणि फक्त्त आपल्या उद्धार कर्त्या डॉ. बाबासाहेबांच्या नावासाठी भीमसैनिकांनी एकनिष्ठ राहून अनेक अन्याय – अत्याचार, जुलूम सहन केले. महाराष्ट्राच्या गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाचा वानवा पसरत होता . जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”’. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्व:ताला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, “नामांतर झालेच पाहिजे” बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले .परभणी जिह्यात पोचिराम कांबळे यांचे हात-पाय जातीयवादी नराधमांनी तोडले, जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी नामांतरवादी क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले.
जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून ४ ऑगष्ट रोजी प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील “लाँगमार्च’ काढला गेला .या लाँगमार्च मध्ये मामा सरदार, कवि.इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे, नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. लाँगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास आहे. नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लाँगमार्चनंतरचा एक महत्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील.
कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे डॉ. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे हि (सरकारी) मागणी. ज्या मनुवादी वेवस्तेने ज्या समाजास हजारो वर्ष गावकुसाच्या बाहेर ठेवले, साधे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला होता त्या लोकांना स्वातंत्र्य नंतर देशात समान नागरिक म्हणून जगण्याचा, प्रगतीकरण्याचा अधीकार मिळवून दिला , माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायीत्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष्य वागणूक देण्यात आली होती.
त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर… चारही बाजूच्या रेट्यामुळे सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. सरकारची नामुष्की होत होती त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे हि सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 16 वर्ष संघर्ष करावा लागला.16 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व त्यांना आंबेडकरी जनतेच्या भावनेचा आदर करत ⭕ १४ जानेवारी इ.स १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला.⭕ नामविस्ताराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांच्या झोपडी-झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या महामानवाला अभिवादन करण्याचा नामांतर हा एक छोटासा प्रयत्न होता. नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीत योगदान दिले ज़िल्हाचा, महाराष्ट्राचा मान व लवकीक वाडवला.
नामांतरासाठी त्यावेळी भीमसैनिकांनी आणि लोकांनी अन्याय-अत्याचार त्रास, यातना भोगल्या आणि अस्मितेचा लढा दिला. त्यांचे दु:ख आजच्या पिढीपर्यंत किती जाणीव आहे. हे सांगता येणार नाही. कारण माणसांची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे.”आपल्याला काय करायचं आहे” अशी मानसिकता वाढत आहे. म्हणून नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्याने करून घेण्याची गरज आहे. तरच नविन इतिहास घडवता येतील.
💐🙏 सर्वाना नामविस्तार दिनाच्या हार्दीक शुभेच्छा आणि नामांतराच्या लढ्यात घरदार, सर्वस्व उद्वस्थ झालेल्या लोकांना, संसाराची पर्वा न करता सामिल झालेल्या सर्वच क्रन्तिकारक नेते, कार्यकर्ते, शहिदांना विनम्र भावपुर्ण आदरांजली आणि क्रांतिकारी जय भीम.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?