भारतातील लोकशाही…!

१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या छेडण्यात आली आहे. याच विषयाला अनुसरून झालेल्या एका चर्चा सत्रात सुधींद्र कुलकर्णी या संघिष्ट आरक्षणविरोधी गांधीवाद्याने बाबासाहेबांची भविष्यवाणी फेल झाली असं विधान केलं. याच चर्चासत्रात एड.प्रकाश आंबेड्कर सुद्धा होते. ते नक्की काय म्हणाले हे वर्तमान पत्रातल्या बातमीवरून ठरवणं कठीण आहे.

बहुतेक लोकांनी या मुलाखतीतील बाबासाहेबांच्या दोन वाक्यांवर चर्चा केली आहे.

१) भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही.
२) एखादा कम्युनिजमचा प्रकार सत्तेत येईल.

१९५३ ची मुलाखत आणि त्या मुलाखतीचा संदर्भ पहिला तर भारताला स्वातंत्र मिळून किमान ७ वर्ष झाली आहेत. काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आहे. लोकशाहीच्या भल्यासाठी आपली सगळी आंदोलन थांबऊन बाबासाहेब संसदीय लोकशाही प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत पण सरकारने ज्या पद्धतीने जातिव्यवस्था नष्ट करून एका समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेत तसे प्रयत्न सरकार करत नाही म्हणून बाबासाहेब नाराज आहे. बीबीसी पत्रकार बाबासाहेबांना विचारतो कि डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही चालेल कि नाही याबद्दल तुम्हाला काय वाटत? यावर बाबासाहेब म्हणतात नाही, खऱ्या अर्थाने नाही तर फक्त औपचारिकता म्हणून लोकशाही चालेल. यावर पत्रकार त्यांना “म्हणजे काय?” विचारतो त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात निवडणुका, पंतप्रधान हे लोकशाहीचे घटक अस्तित्वात असतील मात्र खरी लोकशाही नसले. निवडणुका महत्वाच्या आहेत पण त्या जर चांगले नेतृत्व निर्माण करत असतील तर महत्वाच्या आहेत. निवडणूक सरकार बदलण्यासाठी असतातअसतात हेच लोकांना काळात नाही. भारतात लोक माणसाला मत देत नाहीत. काँग्रेस म्हणते बैलाला वोट द्या. लोक बैलाला वोट देतात पण त्या बैलाच्या मागे गाढव आहे कि माणसू हे लोक पाहत नाहीत. भारतात जो पर्यंत जातीव्यवस्था टिकून आहे तो पर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण होणार नाही. नेहरूजी जातिव्ययवस्थे विरोधात कितिही विधान करत असले तरीही आता मला भाषणांचा कंटाळा आला असून सरकारने लवकरात लवकर काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत.

आपल्या देशातील सामाजिक संरचना पाहता इथे लोकशाही औपचारिकपणे चालेल मात्र मूलभूत पातळीवर लोकशाही चालणारं नाही. लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी सामाजिक पातळीवर बदल केला पाहिजे. शांततापूर्ण मार्गाने सामाजिक बदलास वेळ लागेल असं सुद्धा बाबासाहेब म्हणतात. पण त्या दृष्टीने काहीतरी ठोस प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा सुद्धा ते व्यक्त करतात आणि सामाजिक बदला अभावी जर लोकशाही अपयशी झाली तर देशात कोणत्याही प्रकारची व्यवस्था निर्माण होऊ शकते, एखाद्या प्रकारचा कम्युनिजम सुद्धा येऊ शकतो असे बाबासाहेब म्हणतात. जेव्हा बाबासाहेब एखाद्या प्रकारचा कम्युनिजम येऊ शकतो असे म्हणतात तेव्हा त्याचा सत्ताधारी वर्गाने, प्रस्थापित वर्गाने फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. देशात कम्युनिजम लोकशाही प्रक्रियेतून नाही तर रक्तरंजित क्रांतीतूनच येईल. सामाजिक लोकशाही अभावी समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय नाकारला गेलेल्या शोषित, वंचित समाजाचा जेव्हा लोकशाही कडून अपेक्षाभंग होईल, जेव्हा त्याचा लोकशाही वरील विश्वास नष्ट होईल तेव्हा तो लोकशाहीचा उध्वस्त करेल. लोकशाही उध्वस्त करण्यासाठी तो निवदेन, मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह या मार्गांचा अवलंब न करता हिंसक मार्गाचा, सशस्त्र क्रांतीचा आधार घेईल. या वर्गाकडे गमावण्यासारखे काहीही नाही. मात्र येथील जो प्रस्थापित वर्ग आहे त्याच्यावर मात्र सगळं काही गमावण्याची वेळ येईल. म्हणून या देशात एखाद्या प्रकारचा कम्युनिजम येईल हे बाबासाहेबांचं वाक्य या देशातील सत्ताधाऱ्यांनी, प्रस्थापितांनी फार गंभीरपणे घेणे फार गरजेचं आहे.

या मुलाखतीच्या ५८ वर्षानंतरही देशात सामाजिक लोकशाही निर्माण झालेली नाही उलट सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी हातभार लावणाऱ्या आरक्षणास संपवण्याचा डाव या देशातील विविध सरकारांनी केला आहे. विशिष्ट जातीच्या लोकांनी सर्व प्रकारच्या सत्तास्थानांवर कब्जा केलेला आहे. १)शासन, २)प्रशासन, ३)न्याययंत्रणा, ४)मीडिया, ५)शिक्षण, ६)धर्म, ७)संस्कृती, ८)व्यवसाय हि सत्तास्थान आहेत. हि सत्तास्थान विशिष्ट जातीच्या ताब्यात असल्यामुळे इथे पक्षपातीपणा आहे. या सत्तास्थानांमध्ये सर्वाना समान प्रतिनिधित्व मिळणे म्हणजे समता प्रस्थिपित करणे. समता हि काही करुणेतून भूतदयेतून निर्माण होत नाही तर ती सत्तेच्या समसमान वाटपातून निर्माण होते. कमजोर वर्गावर दया करणे हि समता नसून कमजोर वर्गाला शक्तीच्या समपातळीवर आणणे हि समता आहे व त्यासाठी आवश्यक सामाजिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी शासन, प्रशासन, न्याय हि विविध यंत्रणा राबविणे म्हणजे लोकशाही व्यवस्था राबवणे आहे. आरक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक, प्रशासकीय व राजकीय सत्तेत काही प्रमाणात सत्तावाटप करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण समसमान सत्तावाटप आणि समता यांचा संबंध आणि समतामूलक राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने त्याचे दूरगामी परिणाम समजून घेण्याची कुवत नसलेलं धर्मजातीच्या स्वार्थाने अंध झालेले लोक आरक्षणाला मेरिट वगैरेंच्या तकलादू फूटपट्ट्या करून विरोध करत आहेत.

१९५३च्या बीबीसी मुलाखतीत बाबासाहेबानी मांडलेला हाच विचार त्यांनी १९४९च्या संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात सुद्धा मांडलेला आहे. सुधींद्र कुलकर्णी सारखे संघिष्ट आरक्षण विरोधी गांधीवादी जर बाबासाहेबांची भविष्यवाणी फेल गेली असे म्हणत असतील तर त्यांनी हि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि या देशातील सत्ताधारी वर्ग या देशातील लोकशाही आपल्या स्वार्थांधाने नष्ट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल याची बाबासाहेबांना पूर्ण खात्री असल्यामुळेच त्यांनी या देशाला अश्या प्रकारची घटना दिली आहे कि ज्यामुळे औपचारिक पातळीवर का होईना या देशात लोकशाही टिकून आहे. भविष्यात सामाजिक लोकशाही अभावी जर या देशातील राजकीय लोकशाही कोसळली तर येथील विविध सत्तास्थानांवर पिढ्यानपिढ्या बैठक मारून बसलेले सुधींद्र कुलकर्णी सारखे दांभिक लोक त्याचा पहिला बळी असतील.

(सागर झेंडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा काही भाग)

———————————

आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/

आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. – https://www.youtube.com/channel/UCNTHN78Rhh–1gZYJ1dwt4A

1 thought on “भारतातील लोकशाही…!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?