सम्राट अशोक जयंती (८ एप्रिल)

८ एप्रिल
सम्राट अशोक जयंती
जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले. केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी , न्यायाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या जोरावर जग जिंकले. काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ, चीन, मंगोलिया इराण, इजिप्त, श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो सम्राट अशोका शिवाय दुसरा राजा कोण असू शकेल? ज्याने भारतीयच नव्हे तर भारता बाहेरील जनतेच्या मनात देखील शेकडो वर्षांपासून प्रेमाचे, आदराचे स्थान मिळवले आहे तो सम्राट अशोका व्यतिरिक्त कोण आहे?
सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व आहे. कलिंगच्या युद्धातील प्रचंड रक्तपाताने राजपुत्र अशोक व्यथित झाला, मानवी जीवणाची क्षणभंगुरता त्याला अस्वस्थ करून गेली आणी मग भगवान बुद्धांच्या धम्ममार्गावर जीवनाची वाटचाल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. युद्धा ऐवजी प्रेमाने प्रजेला जिंकणारा, प्रजेवर मुलांसारखे प्रेम करणारा, प्रजेची पित्याप्रमाणे काळजी घेणारा, शेजारी देशांना घाबरू नका आपण एकमेकांवर विश्वास ठेवून आनंदाने राहू शकतो असा मित्रांप्रमाणे विश्वास देणारा देवानामप्रिय, प्रियदर्शी अशोका सारखा सम्राट पुन्हा होणे नाही. सम्राटाने बौद्ध धम्माला अनुसरून देशात लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली. अगदी ग्रामपंचायत पातळी पासून शासनव्यवस्था निर्माण केली, अतिशय प्रभावी अशी महसूल व्यवस्था निर्माण केली, जनतेला शेतीसाठी जमिनीचे पट्टे वाटले, रस्ते बांधले, तलाव, विहिरी निर्माण केल्या, नदीवर बांध घालुन हि भूमी सुजलाम-सुफलाम केली, जनतेच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आरोग्यशाला, मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा निर्माण केल्या, मुलांचे संगोपन हि राज्याची जबाबदारी आहे असा नियम बनवला, भुकेल्यांसाठी अन्नछत्र निर्माण केले, जनतेला चोर, दरोडेखोर, लुटारू यांच्यापासून सरंक्षण दिले व्यापाऱ्याना सरंक्षण दिले, व्यापारी मार्गांवर विश्रांती स्थळ निर्माण केले, सम्राटाने व्यापा-यांना देश-विदेशात व्यापार करायला प्रोत्साहन दिले, सम्राटाच्या पाठींब्यावर भारतीय व्यापाऱ्यानी इजिप्त, ग्रीस, सीरिया, पूर्व आशिया आणि मध्य आशियातील देशांशी समुद्रमार्गे आणि भूमार्गे व्यापार केला. म्हणतात कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघायचा, हाच तो काळ ! अशोकाच्या काळात जागतिक व्यापारातील ४०% हिस्सा भारताचा होता.
त्याकाळात सम्राटाच्या नेतृत्वाखालील भारत एक जबाबदार जागतिक महाशक्ती होता. सम्राट अशोका यांनी भिक्खूसंघाला देशविदेशात धम्म प्रसारासाठी पाठवले. बौद्ध भिक्खू बौद्ध तत्वज्ञानं चीन सहित पूर्व आशिया, इराण, मध्य आशिया, इजिप्त आणि ग्रीस पर्यंत घेऊन गेले. स्वतः सम्राटाने स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा धम्मप्रसारासाठी दान केले. जेव्हा बालक राहुलने आपला पिता भगवान बुद्धांकडे वारसा मागितला तेव्हा बुद्धांनी राहुलला वारश्यात कपिलवस्तुच राज्य न देता, कोणतीही संपत्ती न देता धम्माचा वारसा दिला, तद्वत सम्राट अशोकाने सुद्धा आपली मुलगी संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांना वारश्यात आपले अफाट साम्राज्य न देता धम्माचा वारसा दिला. आदी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि जो अंतीही कल्याणकारी आहे अश्या बौद्धधम्माला अभिप्रेत लोककल्याणकारी आज्ञा असलेले ८४ हजार शिलालेख, प्रस्तरखंड, गुंफा कोरल्या आणि केवळ आज्ञा कोरल्या नाहीत तर त्यानुसार राज्यकारभार चालतोय कि नाही यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुद्धा निर्माण केली. अगदी इराण मधे सुद्धा हे शिलालेख सापडले आहेत. अवघ्या जगाने गौरवलेला हा सम्राट मात्र दुर्दैवाने काही काळ भारताच्या विस्मृतीत गेला. सम्राटाच्या पुनर्शोधाची कथा इथे विस्तार भयास्तव देता येणार नाही.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?